*स्वास्थ्य समग्र*
थेंबा थेंबा नी आपलं जीवन समृद्ध करणारा, सृष्टीच्या कणाकणात चैतन्य पेरणारा, मनामनांना आनंदाच्या अमृतधारा ने भिजवणारा आणि तरलकाव्य भावनांना उत्फुल्लित करणारा एकमेव अद्वितीय असा ऋतुराज म्हणजे *वर्षा ऋतू* होय अशा या आनंदाचे निधान असलेल्या वर्षा ऋतूचा आस्वाद घ्यायचा असेल तर ऋतुसात्म्य गोष्टींचा अंगीकार स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे . वर्षा ऋतूमध्ये अन्नाचे पचन करणारा अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे आहारामध्ये आम्ल व लवणरस जो अग्नी प्रदीपक आहे व वातशामक आहे या रसात्मक आहारीय पदार्थांचा तसेच स्निग्ध पदार्थांचा वापर आहारामध्ये करावा . जे आहारीय पदार्थ एक वर्ष जुने आहेत विशेषतः गहू , तांदूळ, डाळी यांचा वापर आहारामध्ये करणे अत्यंत आवश्यक असते कारण ते पचायला हलके असतात. साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या, भर्जित धान्य यांचा समावेश करावा . जेवण भूक लागल्यावर क्षमतेनुसार करावे . शक्यतो रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे . दोन्ही वेळचे जेवण ताजे व गरम असावे. जेवणामध्ये वातूळ पदार्थ जसे उसळी, बेकरीचे पदार्थ, कच्चे पदार्थ, थंड पदार्थ, शिळे पदार्थ हे जरूर टाळावे खरंतर वर्षा ऋतूमध्ये तीनही दोषांचा म्हणजे वात पित्त कफ यांचे संतुलन ठेवणे आवश्यक असते त्यामुळे त्याला अनुषंगून असा आहार जो आपली पचनशक्ती निरोगी ठेवेल असा घेणे अत्यंत आवश्यक असते आपल्या परंपरेमध्ये अन्न हे *पूर्णब्रह्म* म्हणून मानलेले आहे आणि त्यामुळे आहाराचा विचार हा केवळ पोट भरणे असा नसून एक प्रकारचे यज्ञ कर्म आहे व जसे यज्ञामध्ये अग्नी असतो तसा शरीरामधला जो अग्नी आहे तो जर प्राकृत ठेवायचा असेल तर ऋतू सात्म्य असा आहार घेणे आवश्यक आहे उपरोक्त विचार हा जसा रसनेंद्रियाच्या संदर्भामध्ये आहे तसाच इतर इंद्रियांच्या संदर्भात देखील आहे उदाहरणार्थ चक्षुरेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय यांचे नियमन देखील आवश्यक आहे त्यामुळे या काळामध्ये प्रवचन ऐकणे , कथा वाचन इत्यादी गोष्टींना देखील महत्त्व आहे कारण इंद्रियांचे प्रसन्नत्व ही स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे .
Comments
Post a Comment